*शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण पिंपळ बीजाभिषेक*
*बायोस्फिअर्स व शिवप्रेमींची दुर्गराज रायगडावर शिवरायांना एक अनोखी मानवंदना*
दिनांक: ०९-०६-२०२५ जेष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात संपूर्ण महाराष्ट्राचे-राष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवप्रेमींची पंढरी असणाऱ्या श्री क्षेत्र दुर्गराज रायगडावर आद्य वृक्ष संवर्धक छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण पिंपळ बीजाभिषेक करण्यात आला. या अनोख्या सोहळ्याच्या निमित्त श्री क्षेत्र रायगडावर, शिवसदरेवर बायोस्फिअर्स संस्था; कोकण कडा मित्रमंडळ, रायगड; शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड; श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची; माऊली हरित अभियान; मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि), यांच्या संयुक्त विद्यमाने देववृक्ष सुवर्ण पिंपळाच्या बीजाचा बीजाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांना करण्यात आला. याप्रसंगी बायोस्फिअर्सचे अध्यक्ष-पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन अनिल पुणेकर, कोकण कडा मित्रमंडळ, रायगड चे पदाधिकारी श्री. परेश सोनावणे, श्री. नितीन सकपाळ, श्री. तेजस पवार, राजपुरोहित श्री. प्रकाश स्वामीजी, ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, बायोस्फिअर्सचे श्री. अमित पायगुडे, श्री. गिरीश गोखले, श्री. गणपत चोर-साळुंके यांच्या हस्ते व इतर शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा विशेष बीजाभिषेक सोहळा संपन्न झाला. सुवर्ण पिंपळ बीज-प्रसादाचे प्रातिनिधिक स्वरूपात शिवप्रेमी, वारकरी व स्थानिक गावकरी यांना वाटप करण्यात आले. श्री जगदीश्वर शिवलिंग, श्री शिरकाई माता आणि श्री शिवसमाधीवर देखील हे बीज अर्पण करण्यात आले. तसेच या वारसा वृक्षाबाबतच्या सचित्र माहिती पत्रकाचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रायगडावरील शिवसदरेवर करून एक अनोखी शिववंदना देण्यात आली.
सदर बीजाभिषेकात वापरलेले बीज हे आळंदी येथील मूळ सुवर्ण पिंपळाचे आहे. सदर बीजाभिषेकात वापरलेले हे बीज संकलित करून महाराष्ट्र व राष्ट्रभर शिवबीजप्रसाद म्हणून सर्वदूर करणार आहोत. जेणेकरून नागरिकांनी जास्तीत जास्त ठिकाणी या बीजापासून रोपांची निर्मिती करून राष्ट्रातील हिरवाई वाढवावी. श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, आळंदी येथे प्रवेश केल्यानंतर उजव्याबाजूला पुरातन काळापासून उभे असलेले पिंपळाचे (अश्वत्थ) झाड आहे त्याला “सुवर्ण पिंपळ” असे संबोधले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मातोश्री रुक्मिणी माता यांनी याच प्राचीन पिंपळास सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या होत्या. सदर पिंपळाचे रोपण हे श्री कुबेराने केले आहे अशी एक जनमान्यता आहे म्हणूनच त्याला सुवर्ण पिंपळ असे संबोधतात. श्री ज्ञानोबाराय आणि या वृक्षाचे देखील एक अलौकिक नातं आहे. माऊलींच्या जन्मापासून ते संजीवन समाधी पर्यंतच्या प्रवासाचा हा वृक्ष साक्षीदार आहे. माऊलींनी समाधिस्त होण्याआधी सुवर्ण पिंपळाच्या पायाशी मस्तक टेकवून नमन केले होते, त्याचा कृपाशीर्वाद घेतला होता. श्री कुबेराने लावलेल्या या सुवर्ण पिंपळाचे हे बीजरुपी हरित धन छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळ्यात व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवराज्याभिषेक दिनी बीजाभिषेकासाठी वापरले जाणे अलौकिक आहे. असा हा भारत राष्ट्राचा वारसा असलेला वृक्ष त्याच्या अध्यात्मिक, पर्यावरणीय तसेच औषधी गुणधर्मांनी सुपरिचित आहे. या सिद्ध वृक्षाचे वर्णन आणि त्याची थोरवी आपल्या संतांनी सांगून ठेवली आहे. जसे की.जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ ।अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥- संत तुकाराम धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥-संत नामदेव समाधिसमयीं सकळ समुदाय । घेउनी सुरवर आले श्रीपंढरीराय । द्वारीं अजानवृक्ष सुवर्ण पिंपळ असुमाय । जाणोनि महिमा निळा चरणातळीं राहे ॥- संत निळोबाराय पिंपळाचे पारीं बैसविल्या पंक्ती। पात्रें ते श्रीपती वाढूं लागे! - संत नामदेव .बायोस्फिअर्स संस्थेच्या माध्यमातून ‘माऊली हरित अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानाचाच एक महत्वाचा पैलू म्हणजे श्री क्षेत्र आळंदी येथील मूळ देववृक्ष सुवर्ण पिंपळाचे बीज व रोपे सर्वदूर पोहचवणे होय. एकुणातच काय या अध्यात्मिक, औषधी आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या वृक्षाच्या संवर्धनासाठी तसेच आपल्या संस्कृती, परंपरेमधल्या महत्वाच्या वारसा वृक्षांबाबत जनमानसात-भाविकांत काही अंशी जाण वाढावी, त्यांच्यात योग्य ती सकारात्मकता यावी, देशातील-राज्यातील हिरवाई वाढावी, स्थानिक जैवविविधता वाढीस यावी, वारसा वृक्षाचे जतन – संवर्धन व्हावं, या उद्देशाने आपल्या संस्कृतीत, परंपरेत विशेष महत्व असलेल्या वृक्षांचे बीज व रोपे माऊली हरित अभियाना अंतर्गत सर्वदूर करत आहोत. हे अभियान म्हणजे जणू अध्यात्म आणि विज्ञान यांची सुरेख सांगडच...! शक्ती आणि भक्तीचा सुरेख संगम. ह्या सिद्ध वृक्षाचा महिमा जाणता या प्रसंगी संत तुकोबारायांचा “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” या अभंगाचे स्मरण आवर्जून होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!